
श्रीसमर्थ वाग्देवता मंदिराचे मुख्य आकर्षण आहे ते समर्थ संप्रदायाचे अध्वर्यु आणि प्रणेते श्री समर्थ रामदास स्वामी यांचे एकत्रितरित्या संग्रहित केलेले वाङ्मय. मंदिराकडे असलेला महत्त्वपूर्ण ठेवा म्हणजे श्री समर्थ रामदासांनी वयाच्या १४व्या वर्षी स्वहस्ते लिहिलेली वाल्मिकी रामायणाची प्रत (समर्थांच्या कुंचल्यातून साकारलेल्या मूळ चित्रांसह), शके १५९६ (इ.स.१६७४) मध्ये श्री समर्थांनी रघुनाथ मठास स्वहस्ते गौरवयुक्त लिहिलेले अस्सल व एकमेव मोडी भाषेतील गद्य पत्र, त्याचसोबत श्रीकल्याण स्वामींनी लिहिलेल्या व डोम गावी मठात विश्वस्त असलेल्या ग्रंथराज 'दासबोधाच्या प्रतीबरहुकूम तंतोतंत केलेली दासबोधाची प्रत हे समर्थ वाग्देवता मंदिराचे मुख्य आकर्षण आहे.
याबरोबरच कल्याणस्वामींच्या हस्ताक्षरातील मनाचे श्लोक, तसेच विविध समर्थ वाङ्मय (हे श्रीकल्याण पोथा म्हणून ओळखले जाते), एकनाथी भागवताची श्रीसमर्थ पूर्वकालीन प्रत, सचित्र पंचरत्नगीता, श्री कल्याणस्वामींनी दिवाकर यांना लिहिलेले पत्र, श्री कल्याणस्वामींनी रेखाटलेले हनुमंताचे चित्र, कवी जयदेव रचित गीत गोविंद काव्याची भारतीय उपखंडातील एकमेव उपलब्ध प्रत, विविध भाषांमधील ग्रंथ, बखरी, त्याशिवाय व्याकरण, संगीत, रागदारी, जमाखर्च, गणित, मंत्रतंत्र, आयुर्वेद, व्रतवैकल्ये, ज्योतिष, यंत्रे, ताम्रपट इ. अनेक चमत्कृतीपूर्ण व ऐतिहासिक महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांचा एकत्रित अनुभव इथे आपल्याला घेता येतो. श्रीसमर्थ संप्रदायाव्यतिरिक्त ८०० हून अधिक तत्कालीन संतांचे वाङ्मय इथे मूळ स्वरुपात उपलब्ध आहे. विषयांनुसार मांडणी करावयाची झाल्यास पोथीपत्रे २९२, युद्धासंबंधी ५३, ज्योतिषासंबंधी ४२, जमाखर्चासंबंधी २४, चित्रांविषयी २३, औषधांविषयी ४५, गाण्यांविषयी २० व किरकोळ विषयांवरील ६९ बाडे येथे पहावयास मिळतात. १०० वर्षापूर्वीच्या बाडांपासून ३५० वर्षापूर्वी पर्यंतची बाडे उपलब्ध आहेत.
४ सूचीखंड अभ्यासकांसाठी उपलब्ध
नानासाहेबांनी सुमारे ३२०० बाडांचे संशोधन करुन ४ सूचीखंड अभ्यासकांसाठी उपलब्ध करुन दिलेले आहेत. त्यातील एक सूचीखंड केवळ सुमारे या ८५० संस्कृत बाडांचा आहे. हे सर्व सूचीखंड अभ्यासकांना संस्थेच्या नियमांच्या व अटींच्या अधीन राहून उपलब्ध करुन दिले जातात. आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक अभ्यासकांनी, संशोधकांनी या बाडांचा अभ्यास करुन पी.एचडी. पदवी प्राप्त केलेली आहे.

हस्ताक्षरातील मनाचे श्लोक
कल्याणस्वामींच्या हस्ताक्षरातील मनाचे श्लोक, तसेच विविध समर्थ वाङ्मय (हे श्रीकल्याण पोथा म्हणून ओळखले जाते)
